एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कमी खर्चाचे कांदाचाळ/ लसूण साठवणूक गृह या घटकांसाठी सुधारित मापदंडानुसार अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’च्या https://mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर फलोत्पादन घटकाखाली अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात कमी खर्चाचे कांदाचाळ/लसूण साठवणूक गृहासाठी सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरिता ५ ते १००० टन क्षमतेसाठी या प्रमाणाधारे ग्राह्य भांडवली खर्चाच्या ५० टक्के आहे. यात ५ ते २५ टन क्षमतेसाठी रुपये १० हजार प्रति टन,
२५ ते ५०० टन क्षमतेसाठी रुपये ८ हजार प्रतिटन व ५०० ते १००० टन क्षमतेसाठी रुपये ६ हजार प्रतिटन अशी अनुदान मर्यादा आहे. खर्च मर्यादा रुपये ७ हजार प्रति टन अशी आहे. या घटकाचा खर्च रुपये ३० लाखांपेक्षा जास्त झाल्यास बँककर्ज अनिवार्य असून, अर्थसाह्य हे बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय असणार आहे.
…या घटकांना मिळणार लाभ
शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज सादर करताना त्यांची स्वत:च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक असून, त्याच्या ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसाह्यता गट, शेतकरी महिला गट, शेतकरी उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल. या बाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही नमूद करण्यात आले आहे.