राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली. मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाले असले, तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ५) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या तापमानात चढ -उतार सुरूच राहणार आहेत.
वेगाने महाराष्ट्रात धडकलेला मॉन्सून कमजोर होताच पावसाने उघडीप दिली. कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश तापमानाची नोंद झाली. बुधवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींनी हजेरी लावली.
आज (ता. ५) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजासंह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
मॉन्सून काही हलेना
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने आगमन करणाऱ्या मॉन्सूनची चाल आठवडाभरापासून थांबली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनचे पुढे चाल केली नाही. अरबी समुद्रातून २६ मेपासून तर बंगालच्या उपसागरातून २९ मेपासून मॉन्सून पुढे सरकला नाही. मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि पूर्व भारतातील बालूरघाटपर्यंतची मॉन्सूनची सीमा ‘जैसे थे’ आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस वाट पाहावी लागणार आहे.