पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देऊन शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेली माहिती अशी की, महानिर्मिती (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लि.) महानिर्मिती ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची सूत्रधारी कंपनीच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी असून, सुमारे १३ हजार ८८० मेगावॉट क्षमतेसह भारतातील सर्वांत मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. नॅशनल थर्मल पॉवर कंपनी नंतर ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची राज्य मालकीची जनरेशन कंपनी आहे. औष्णिक, वायू, जल विद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रात वैविध्य असलेली महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे, ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात वीजपुरवठा करत कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे.
द रॉकफेलर फाउंडेशन, इकिया फाउंडेशन आणि बेझॉज अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन झालेली जीईएपीपी इंडिया (ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट) ही संस्था विकसनशील देशांमध्ये न्याय्य, समतोल व वेगवान हरित ऊर्जेसाठी मदत करते. जीईएपीपी इंडिया ही जीईएपीपी एलएलसीची भारतीय शाखा असून, विशेषतः वितरणक्षम ऊर्जेसाठी उपयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी करत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज देणे हे राज्य शासनाचे ध्येय आहे. कृषी ग्राहकांच्या सेवेखर्चात कपात करून शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आहे. ही योजना वितरित पद्धतीने नवीकरणीय ऊर्जा वापरून कृषी वापरासाठी सौर प्रकल्प जोडण्यात येतात. २०२५ पर्यंत सुमारे ३० टक्के फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ०.५ मेगावॉट ते २५ मेगावॉट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ – १० किमी परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जातात.
जीईपीपी इंडिया हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रकल्प मॉनिटरिंग युनिट सुविधा आणि एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहे, माहितीचे संकलन या प्रकल्पाची सद्यःस्थिती आणि प्रकल्पांचे सुलभ व्यवस्थापन शक्य होईल.जीईपीपीच्या तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करून मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०ची प्रभावी अंमलबजावणी करणे. महाराष्ट्रात शाश्वत विकासास चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हे सौरऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेबाबत मार्गदर्शन करेल. या समितीमध्ये सर्व सहभागधारक यांचा समावेश असणार आहे. जीईएपीपी इंडिया (ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅने व महानिर्मितीतर्फे सेंट्रल डॅश बोर्ड तयार करण्यात येणार असून यामार्फत जमीन संपादन ते प्रकल्प उभारणी प्रगती याच्या दैनंदिन तत्वावर अवलोकन करण्यात येणार आहे.