केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी बीटी कापूस वाणांच्या उत्पादकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून कापसासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज व्यक्त केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री बुधवारी (ता.१६) बोलत होते. या वेळी आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट उपस्थित होते.

भारतातील कापूस उत्पादकता अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रोगप्रतिरोधक वाण आणि उच्च उत्पादकतेची वाणे विकसित करण्याची गरज कृषिमंत्री चौहान यांनी व्यक्त केली. ‘बीटी कापूस वाणांची लागवड केल्याने शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात गुलाबी बोंड अळीसह अनेक समस्यांमुळे कापूस उत्पादन घटले आहे,’ असे श्री. चौहान म्हणाले. तसेच देशातील कापसाचे उत्पादन कमी का झाले, याचे आत्मपरीक्षण आयसीएआरने करावे, असे त्यांनी सांगितले.

अलीकडेच कोइमतूरमध्ये झालेल्या बैठकीत कापसाच्या घटत्या उत्पादकतेबद्दल कृषिमंत्री चौहान यांनी चिंता व्यक्त केली होती. आयसीएआरचे महासंचालक डॉ. जाट यांनी संशोधनात खासगी कंपन्यांच्या निधीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे सांगितले. तसेच देशभरातील शंभरहून अधिक संशोधन संस्थांनी तयार केलेली दिशादर्शक आराखडे या वर्षी कृतीत उतरवले जातील. हवामान बदलासह तेलबिया व कडधान्य संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खत विक्रीतील लिकिंग

खतांच्या विक्रीत होणाऱ्या फसवणुकीवरही कृषिमंत्री चौहान यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक व्यापारी अनुदानित युरिया व डीएपीसोबत नॅनो खतांची जबरदस्तीने लिकिंग करून विक्री करत आहेत. ही पद्धत थांबविण्यासाठी त्यांनी कृषी सचिवांना शेतकऱ्यांसाठी थेट तक्रार करण्याची हेल्पलाइन सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या संदर्भात अद्यापही योग्य कारवाई होत नसल्याची कबुली कृषिमंत्र्यांनी दिली.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/question-mark-over-bt-cotton-productivity-rat16

माहिती शेअर करा