देशात मक्याला इथेनाॅलमुळे चांगला भाव मिळत आहे. भारतात मका वाढीसाठी मोठी संधी आहे. मक्यामध्ये जास्त स्टार्च आणि उत्पादकता असलेल्या वाणांचा विकास करून देशातील मका उत्पादन २०२४७ पर्यंत दुपटीहून अधिक वाढू शकते, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकत्याच झालेल्या मका परिषदेत सांगितले. जगात मका उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकावर आहे. जागतिक पातळीवर भारताची मका उत्पादकता कमी आहे.
देशात जनुकीय सुधारित वाणांचा वापर न करता मक्याची उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे, असे श्री. चौहान म्हणाले. “आपण जीएम वाणाचा वापर करत नाही, तरीही देशात उत्पादकता वाढीसाठी मोठी संधी आहे. भारताची हेक्टरी उत्पादकता ३.७ टन आहे. त्यातही पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यातील उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. परंतु देशाची सरासरी उत्पादकताच कमी आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने २६५ मका वाण विकसित केले आहेत. त्यापैकी ७७ संकरित आहेत, तर ३५ बायो फोर्टिफाइड वाण आहेत. परंतु या आघाडीवर आणखी काम होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संधीदेखील आहे. देशातील उत्पादन २०४७ पर्यंत मका उत्पादन ८६० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते.
यंदा देशात ४२३ लाख टन उत्पादन झाले आहे,” असे श्री. चौहान म्हणाले. मक्याचा आणखी कार्यक्षम वापर होण्यासाठी मक्यातील स्टार्चचे प्रमाण वाढविणेही आवश्यक असल्याचे श्री. चौहान यांनी स्पष्ट केले. “सध्या देशात उत्पादित होणाऱ्या मक्यात स्टार्चचे प्रमाण ६५ ते ७० टक्के आहे. ते ७२ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची गरज आहे. देशातील मक्याचे उत्पादन वाढत आहे. देशात १९०० मध्ये १०० लाख टन मक्याचे उत्पादन होत होते. ते आता ४२३ लाख टनांवर पोहोचले आहे. देशात आणखी मका लागवडीसाठी संधी आहे. पंजाब आणि हरियानासारख्या राज्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या राज्यांमध्ये मक्याची लागवड वाढवणे आवश्यक आहे,” असेही श्री. चौहान यांनी सांगितले.