भारताला जगाची ‘फ्रुट बास्केट’ बनविण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले असून त्याचे नेतृत्व निर्विवादपणे महाराष्ट्र करेल. या योजनेतून द्राक्षासाठी पुण्यात, संत्र्यासाठी नागपूरला; तर डाळिंबाकरीता सोलापूरमध्ये ‘शुद्ध लागवड सामग्री केंद्र’ (क्लिन प्लॅंट सेंटर) स्थापन केले जातील, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाने देशातील पहिली आंतरराष्ट्रीय ‘अॅग्री हॅकॅथॉन’ पुण्याच्या कृषी महाविद्यालय प्रांगणात आयोजित केली होती. या तीन दिवसीय उपक्रमाच्या मंगळवारी (ता. ३) झालेल्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे, पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हॅकॅथॉनमध्ये ‘कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग’ या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल ‘जयेश एआय सोल्यूशन’ यांना २५ लाखांचे पारितोषिक देत गौरविण्यात आले.
अत्याधुनिक रोपवाटिका तयार करणार : चौहान
श्री. चौहान म्हणाले, ‘‘फलोत्पादनात आज भारत अग्रगण्य असण्याचे श्रेय महाराष्ट्रातील कष्टाळू शेतकरी व राज्य शासनाच्या धोरणाला आहे. मात्र, फलोत्पादनात शुद्ध लागवड सामग्रीचा अभाव आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व कीडरोगमुक्त वाण मिळत नसल्यामुळे उत्पादन घटते. पीकसंरक्षण खर्च वाढतो. ही समस्या हाताळण्यासाठी देशात ९ ठिकाणी ‘शुद्ध लागवड सामग्री केंद्र’ (क्लिन प्लॅंट सेंटर) स्थापन केले जाणार आहेत. त्यातील तीन महाराष्ट्रात असतील. या केंद्रांसोबत इस्राईल व हॉलंडच्या मदतीने अत्याधुनिक रोपवाटिका तयार होतील. त्यामुळे या राज्यातून जगाला उत्कृष्ट फळे निर्यात होतील.’’
शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांमध्ये तयार झालेल्या दरीवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले की, शेतकरी व शास्त्रज्ञ एकत्र आले तर चमत्कार होऊ शकतो. कृषिमंत्री म्हणून मीसुद्धा केवळ दिल्लीत राहून जमणार नाही. मंत्री शेतात जात नाही व शेतकऱ्यांचे ऐकत नाही तोपर्यंत कृषिविकास होणार नाही. त्यामुळे मीदेखील शेतकऱ्यांसोबत सतत राहण्याचा प्रयत्न करतो आहे. कृषी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत काम करतात. त्यांचे संशोधन वेळेत शेतात पोचत नाही. इकडे मात्र नव्या तंत्राच्या प्रतीक्षेत शेतकरी शेतात राबत आहेत. केंद्रीय संस्थेकडे १६ हजार कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांना आता आम्ही गावागावात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.