गेल्या अकरा दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्याने शेतकरी कोलमडून पडला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ४८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मात्र पावसाची हजेरी दररोज असल्याने नुकसानीचा आकडा वाढता आहे. बुधवारी (ता. २९) सकाळी लवकर पावसाने अनेक भागात हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २९ ते २ नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पाच दिवस ढगाळ वातावरण कायम राहील, असे सांगण्यात आले आहे. कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज लक्षात घेता ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात तसेच घाट क्षेत्रातील तुरळक ठिकाणी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.