सांगली जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित आंबिया बहारातील केळी, आंबा, डाळिंब आणि द्राक्ष पिकांसाठी यंदा ६ हजार ९२७ शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. गतवर्षी ५ हजार ३८१ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत अंबिया बहरात १ हजार ५४६ ने शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.
अतिवृष्टी, पावसाचा खंड, यासह नैसर्गिक आपत्तीमुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला, तर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. यासाठी शाससाने पुनर्रचित हवामान आधारित आंबिया बहरातील फळ विमा योजना सुरू केली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी आणि आंबा ही पिके या योजनेत आहेत. गत वर्षी ५ हजार ३८१ शेतकऱ्यांनी विमा घेवून ३ हजार ३३७ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते.
जिल्ह्यात यंदाच्या पुनर्रचित हवामान आधारित अंबिया बहारातील फळ पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. तसेच गावोगावी जावून याचा प्रचार आणि प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा योजनत सहभागी झाले आहेत. यंदा जिल्ह्यातील ६ हजार ९२७ शेतकऱ्यांनी विमा घेत ४ हजार ५२६ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे.