वाशीम जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये सध्या मृग बहराने फूट घेण्यास सुरुवात केली असली, तरी हवामानातील अस्थिरतेमुळे बागायतदार शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे झाडांवरील ताण काहीसा कमी झाला होता.
बहर फुटण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली असून जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या तीव्र उन्हामुळे संत्रा झाडांवर आलेली फुले मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत. यामुळे संत्रा उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संत्रा बागा फुलोऱ्यात असताना उष्णतेचा झटका बसल्याने परागीभवनात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे फळधारणेचे प्रमाण घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बहाराच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन सुरू केले असून काही ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जात आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत संत्रा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. संत्रा हे जिल्ह्याचे महत्त्वाचे नगदी पीक बनलेले असून त्यावर अनेक शेतकऱ्यांचा उपजीविका अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जर हा मृग बहर पूर्णपणे यशस्वी झाला नाही, तर यावर्षी संत्रा उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/orange-blossom-in-trouble-in-washim-rat16#goog_rewarded