जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे. हमीभावाऐवजी मातीमोल दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे खराब झालेला माल, ओलसर कापूस आणि रखडलेली सीसीआय खरेदी यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
दिवाळीचा सण… पण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सण नव्हता, तर संघर्षाचा काळ ठरला आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे कापसामध्ये ३० ते ४० टक्के आर्द्रता निर्माण झाली. यामुळे व्यापारी केवळ ३ ते ६ हजार रुपये दरानेच खरेदी करत आहेत. सीसीआयची केंद्र सुरू न झाल्यामुळे सरकारने निश्चित केलेला ८१०० रुपयांचा हमीभाव शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. सीसीआय आणि जिनर्स यांच्यातील निविदा अटींवरील मतभेदामुळे अद्याप सीसीआयची खरेदी सुरू झालेली नाही. सीसीआय केवळ १२ टक्क्यांपर्यंतच आर्द्रता असलेला कापूस खरेदी करते. दरम्यान शेतकऱ्यांकडे सध्या असलेल्या कापसामध्ये ३५ ते ४० टक्के आर्द्रता आहे. त्यामुळे सीसीआयची खरेदी सुरू झाली तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.