‘एल निनो’मुळे मॉन्सूनच्या पावसात ४३ टक्क्यांची तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातील खरीप पेरणीवर याचा परिणाम होणार असून, या पार्श्वभूमीवर, पिकांच्या नुकसानीचा सर्वाधिक धोका (असुरक्षित) असलेले १११ जिल्हे हे संवेदनशील असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे दिली.
देशावरील एल निनो संकटाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. २३) आयोजित उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विविध राज्यांचे मंत्री, सचिव, तज्ज्ञ, अभ्यासकांसह शासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले, की मॉन्सूनची कमकुवत स्थिती २ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांकडे खरीप पिकांच्या पेरणीसाठी खूप कमी वेळ उरला आहे. २२ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, खरीप पिकांची पेरणी एकूण क्षेत्राच्या १० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ११.९९ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत किंचित जास्त असले (गेल्या वर्षी ११.७९ दशलक्ष हेक्टर होते), तरी सोयाबीन वगळता इतर बहुतांश पिकांची पेरणी गतीने सुरू आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/el-nino-monsoon-deficit-111-districts-risk-rat16